“राज्य शासनाने शालेय शिक्षणात सापांची वैज्ञानिक तथा शास्त्रीय माहितीत समाविष्ट करावी” – वनिता बोराडे (सर्पमित्र / सर्पतज्ञ)
पर्यावरणीय असंतुलन व शालेय अभ्यासक्रमाची गरज :
सध्याच्या काळात पर्यावरणीय असंतुलन, निसर्गाचा ऱ्हास, वनक्षेत्रांवरील मानवी अतिक्रमण तसेच साप आणि इतर वन्यजीवांविषयी जनसामान्यांमध्ये भीती, अज्ञान व अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात आढळतात. मानव–वन्यजीव संघर्षाची तीव्रता वाढत असून ग्रामीण व शहरी भागात सर्पदंशाच्या घटनांची संख्या सतत वाढत आहे. यामुळे मानव आणि पशुधन या दोघांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण पातळीवर विद्यार्थ्यांना योग्य वैज्ञानिक माहिती, पर्यावरणविषयक संवेदनशीलता आणि वन्यजीवांविषयी योग्य दृष्टीकोन विकसित करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच निसर्ग, वन्यजीव, साप, वने व पर्यावरण याविषयी पायाभूत ज्ञान दिल्यास भविष्यात पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि संशोधन यांसारखी कार्ये अधिक परिणामकारक होतील. म्हणूनच “साप, वन्यजीव, वने, निसर्ग व पर्यावरण” हे विषय शालेय पाठ्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण अंग म्हणून तातडीने समाविष्ट करणे ही काळाची निकड आहे. या अनुषंगाने संबंधित विभागाने यावर स्पष्ट, वस्तुनिष्ठ आणि तातडीने भूमिका मांडणे आवश्यक आहे.
सर्पदंश प्रतिबंध, जनजागृती आणि अभ्यासक्रमाची आवश्यकता :
ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा सापांशी वारंवार संपर्क येत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे प्रमाण अधिक आहे. परिणामी सर्पदंशापासून बचाव न होणे, योग्य प्राथमिक उपचारांचा अभाव आणि भीतीमुळे सापांची अनावश्यक हत्या केली जाते. विषारी, बिनविषारी आणि निमविषारी सापांविषयी वैज्ञानिक, प्रमाणित आणि शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच दिल्यास— • लोकांचा जीव वाचेल, • सापांची अनावश्यक हत्या टळेल, • मानव–साप संघर्ष कमी होईल, • आणि पर्यावरणातील जैवसंतुलन राखण्यास मदत होईल. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात सापांविषयीची मूलभूत, वैज्ञानिक माहिती समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे.
भारतातील सर्पदंश स्थिती व अभ्यासक्रमाची अनिवार्यता :
जगातील सर्वाधिक विषारी साप ऑस्ट्रेलियात आढळूनही तेथे सर्पदंश मृत्यूचे प्रमाण जवळपास शून्य आहे. पण भारतात विषारी सापांच्या तुलनेत बिनविषारी सापांची संख्या अधिक असूनही येथे सर्पदंश मृत्यूचे प्रमाण जगातील सर्वाधिक आहे. लोक बिनविषारी साप दंश झाल्यानंतरही भीती, घबराट, मानसिक धक्का आणि अज्ञान यामुळे मृत्यूमुखी पडतात. याची प्रमुख कारणे म्हणजे— योग्य जनजागृतीचा अभाव, • सर्पदंश प्रतिबंधात्मक उपायांची माहिती नसणे, • प्राथमिक उपचारांविषयी अपुरी शास्त्रीय जाणीव. जगातील पहिल्या महिला सर्परक्षक वनिता बोराडे यांनी ‘सोयरे वनचरे फाउंडेशन’ मार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी २.५ ते ३.५ लाख लोक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात, तर महाराष्ट्रातच ३० ते ४० हजार मृत्यू होतात, असे आढळते. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून जीव–जमीन–जल–जंगल या जैवविविधतेशी निगडित असलेल्या विषयाची पायाभूत माहिती विद्यार्थ्यांना लहानपणापासून देणे अनिवार्य व अत्यावश्यक ठरते.
- https://ajinkyabharat.com/include-snakes-and-wildlife-information-in-the-school-curriculum-vanita-borades-urgent-demand-to-the-government/
- https://shetkarinews.live/2025/12/shaley-abhyaskrmat-sap-v-vnyjeevanche-vaigyanik-gyan-smavishht-kranyachee-maganee-srptgy-vnita-borade/
- https://epaper.tarunbharat.net/article.php?mid=Akmpage_2025-12-11_4a2a3e8ebf05ba4e8eca84d9d44cc011_ai
- https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOKSAM_AKLS_20251210_2_7

Comments
Post a Comment